आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील सप्तश्रृंगी मंदिरात मागील 40 वर्षापासून सेवाकार्य करत असलेल्या माधव तुकाराम गिते (वय 81) यांचे नवरात्र काळात देवीपुढे हवन सुरु असताना ह्रदय विकाराचा जोरदार झटका बसल्याने मृत्यू झाला आहे.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, आश्वी बुद्रुक येथे धार्मिक क्षेत्रात मोठे काम केलेल्या माता सोनाई यांनी माधव गिते यांना पुत्र मानले होते. घरची परिस्थिती हलाकीची असली तरी गिते यांनी माळेवाडी (शिबलापूर, ता. संगमनेर) शिवारात कष्टातून माळरानावर नंदनवन फुलवत प्रगती साधली. याकाळात त्यांनी शिक्षित व आदर्श पिढी घडवण्याचे कार्य केल्यामुळे परिसरात त्यांनी नावलौकिक ही मिळवला.
मागील 40 वर्षापासून सोनाई मातेच्या सांगण्यावरुनच गिते हे आश्वी बुद्रुक येथील सप्तशृंगी मंदिरात सेवा कार्य करत होते. या मंदिर जिर्णोद्धारासाठी मोठी मदत त्यांनी दिली होती. तसेच प्रत्येक नवरात्र काळात 7 व्या माळेला होम-हवन, पुजा आर्चा, धार्मिक विधी व फराळ वाटप कुटुंबियासमवेत मोठ्या उत्साहाने अखंडपणे करत होते. नुकत्याचं संपन्न झालेल्या नवरात्र उत्सवातील 7 व्या माळेला (बुधवार) होमहवन विधी सुरु असताना माधव गिते यांना ह्रदय विकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतू उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
माधव गिते हे निःस्वार्थ भावनेतून करत असलेल्या सेवा कार्यामुळे देवीच्या दारातच मृत्यू होण्याचे भाग्य त्यांना लाभल्याचे व सेवा फळाली आल्याची चर्चा आश्वी परिसरात सुरु असून कुटुंबियांनीही हिच भावना बोलून दाखवली आहे. दरम्यान माधव गिते यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातंवडे असा मोठा परिवार असून शिक्षक भाऊसाहेब गिते, भास्कर गिते, संतोष गिते यांचे ते वडील होत.