गडचिरोली | Gadchiroli
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांना नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. वर्षभरात आत्राम यांना नक्षल्यांनी तिसऱ्यांदा धमकी दिली आहे. नक्षल्यांनी गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोलीतील या लोह प्रकल्पाचे समर्थन केल्यामुळे पहिल्यांदा हिवाळी अधिवेशनात आणि त्यांनतरही एकदा नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. आता पुन्हा एकदा नक्षल्यांनी गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे.
मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रकल्पाला समर्थन केल्याची किंमत चुकवावी लागेल, अशा प्रकारची धमकी देणारे पत्र गट्टा परिसरात आढळून आले. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास यांच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ आणि कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत.
दरम्यान पोलिसांकडून या धमकीला गांभीर्याने घेण्यात आले आहे. गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सध्या झेड दर्जाची सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. मिळालेल्या धमकी पत्रकांबाबत तपास सुरू आहे, असे देखील त्यांनी सांगितले.