सटाणा l प्रतिनिधी
लग्नसोहळयात लेटेस्ट ट्रेंड नेहमीच बघितले असतील मात्र ज्या बळीराजाने घडवले.. ज्यामुळे जगण्याची नवी उमेद मिळाली. याचा मान राखत ब्राह्मणगाव येथील थोरात परिवाराने मुलं कुठेही मोठ्या पदावर नोकरीला असली तरी त्यांची मातीशी असलेली नाळ त्यांच्या आजच्या कृतीतून दाखवून दिली आहे.
बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रवींद्र रामदास थोरात यांचा मुलगा भूषण व मोठाभाऊ वनाजी अहिरे यांची कन्या गायत्री यांचा आज (दि. 18) ब्राह्मणगाव येथे लग्नसोहळा होता. थाटात पार पडलेल्या लग्नसोहळयानंतर वधू-वराला बैल गाडीतुन प्रवास करून निरोप देण्यात आला.
यावेळी बैलांना सजवून त्यांच्या अंगावर झालर टाकत आकर्षक सजावट करण्यात आली. बैलगाडीवर नववधू वरास बसण्यासाठी आसन ठेवण्यात आले होते. झेंडूच्या फुलांच्या माळांनी बैलगाडी सजवून आकर्षक दिसण्यासाठी झाडांच्या हिरव्या फांद्यांनी अधिक लक्ष वेधले.
गावात वधू-वरांनी देवदर्शन केले. यावेळी गाववासीयांनी अनोख्या मिरवणुकीचे कौतुक केले. एवढे मोठे असूनही निरोप बैलगाडीने दिल्यामुळे अनेकांना 1950 नंतर होणारे पारंपरिक विवाहाची अनुभूती देखील मिळाले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वेळचे लग्न असेच म्हणत या मिरवणुकीचे मनोभावे स्वागत केले.