दिल्ली । Delhi
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये (Parliment Monsoon Session) मणिपूरवरुन गदारोळ सुरु आहे. याचदरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय दलाची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बोलताना पीएम मोदींनी थेट विरोधकांच्या महाआघाडीवर निशाणा साधला. तसंच त्यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’वर (INDIA) पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत सडकून टीका केली. त्यांनी विरोधकांच्या इंडियाची तुलना इस्ट इंडिया, इंडियन मुजाहिद्दीनसोबत (East India) केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, केवळ इंडिया हे नाव ठेवल्याने काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया होते आणि इंडियन मुजाहिद्दिनच्या नावातही इंडिया आहे. विरोधक विखुरलेले आणि हतबल झाले आहेत. त्यांना फार काळ सत्तेवर येण्याची इच्छा नाही, असे विरोधकांच्या वृत्तीवरून दिसत आहे. असा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला. तसंच, 2027 पर्यंत भारताला विकसित देश बनवणे आणि तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे. हे आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये त्यांनी १५ ऑगस्टला प्रत्येक घरी झेंडा लावण्याच्या कार्यक्रमाबद्दल देखील माहिती दिली. देशातील प्रत्येक विधानसभेतून मातीने भरलेला अमृत कलश दिल्लीत आणून अमृतवन दिल्लीत उभारले जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी १५ ऑगस्टला प्रत्येक घरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. या पावसाळी अधिवेशन काळातील ही संसदीय पक्षाची पहिलीच बैठक होती. ही बैठक संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये पार पडली.