Thursday, April 25, 2024

दसरा

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा‘ असा हा सण विजयादशमी म्हणजेच दसरा हा संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शारदीय नवरात्र संपताच येणारा सण किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी असणारा सण म्हणजे दसरा होय. त्यामुळे दसरा हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हे पर्व रामायणातील कथेशी संबंधित आहे. असं मानलं जातं की, या दिवशी भगवान राम यांनी अहंकारी लंकापती रावणाचा वध केला होता. तेव्हापासून दसरा हा सण साजरा केला जाऊ लागला. या दिवशी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर काही ठिकाणी विजयादशमीच्या निमित्ताने रावणाच्या पुतळ्याचं दहनही केलं जातं आणि सोबतचं रामलीलेचंही आयोजन आवर्जून केलं जातं.

हा सण दरवर्षी अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. धार्मिक कथेनुसार या दिवशी भगवान रामाने अत्याचारी रावणाचा वध केला होता. विजयादशमीच्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केल्याचीही आख्यायिका आहे. आणि यामुळेच देशातील काही भागात या दिवशी माता दुर्गेची षोडशोपचारे पूजा केली जाते. दसरा हे पर्व चांगल्याचा वाईटावरील विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केला होता आणि माता सीतेची सुटका करून तिला परत आणलं होतं. दसरा हा विजयादशमीच्या

- Advertisement -

नावाने यामुळेच ओळखला जातो. खरंतर वानर सेना आणि लंकापती रावणामध्ये हे युद्ध तब्बल 10 दिवस सुरू होतं आणि दहाव्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. त्यामुळेच दसरा म्हणजेच विजयदशमी म्हणून साजरा केला जातो. े

भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या वनवासादरम्यान एक दिवस जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं. तेव्हा भगवान राम यांनी आपली पत्नी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी लंकेवर आक्रमण केलं. या दरम्यान रामाची वानर सेना आणि रावणाची राक्षसी सेना यांच्यात महाभयंकर युद्धही झालं. ज्यामध्ये रावण, मेघनाथ, कुंभकर्ण यासारख्या सर्व राक्षसांचा वध झाला. एवढंच नाहीतर दसर्‍याचा सण हा रावणाला पराभूत करून भगवान रामाला मिळालेल्या यशाच्या आनंदात साजरा केला जातो. दसर्‍याची एके आख्यायिका अशीही आहे की, या दिवशीच पांडव हे आपला अज्ञातवास संपवून परतले होते. असं म्हणतात की, अज्ञातवासात जाण्याआधी पांडवानी आपल्या सर्व शस्त्रात्र ही शमीच्या झाडात लपवली होती. त्यामुळे या दिवशी शमीची पूजा आवर्जून केली जाते. तसंच या झाडाचं औक्षणही केलं जातं. तर माता दुर्गेने दशमीच्या दिवशी महिषासूराचा वध करून देवीदेवता आणि मनुष्याला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केलं होतं आणि म्हणूनच विजयादशमी साजरी केली जाते. या दोन्ही गोष्टींमुळे विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो.

उत्तर भारतात दसरा म्हणजेच विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहन आणि रामलीला यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात. तर महाराष्ट्रात दसर्‍याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपट्याची पानं म्हणजेच प्रतीकात्मक सोनं लुटण्यात येतं. आपट्याची पानं सोनं म्हणून आपल्या नातलगांना आणि मित्रपरिवाराला आवर्जून दिली जातात. तसंच दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी गृहप्रवेश, वाहन खरेदी आणि सोनं खरेदी अशी सर्व चांगली कार्य हमखास केली जातात. त्यामुळे महाराष्ट्रात दसरा सण आवर्जून आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून शस्त्रास्त्रांची पूजा ही केली जाते. तसंच काही जण आधुनिक युगातील शस्त्र म्हणून लॅपटॉप आणि चोपडी पूजनही करतात. पाटीवर सरस्वती काढून खास वही-पुस्तकाचं पूजन केलं जातं.

घराला, दारांना, झेंडूच्या तोरणाने सजवलं जातं. घरी गोडाधोडाचं जेवण करून या दिवसाला जल्लोषात साजरं केलं जातं. जसं दसर्‍याला पारंपारिक महत्त्व आणि आख्यायिका आहे. तसंच चांगल्याचा वाईटावरील विजय म्हणूनही महत्त्व आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या