अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून काल गुरूवारी नगर जिल्ह्याच्या विविध भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस कोसळला.
या पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा तसेच द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.
18 तारखेला नगर जिल्ह्यात पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या जिल्ह्यासाठी यलो अलर्टही घोषित करण्यात आले होते. त्यानुसार काल दुपारपासूनच ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता.
त्यानंतर सोसाट्याच्या वार्यासह सायंकाळी व रात्री श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, राहुरी, नेवासा, कोपरगाव, अकोलेत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस कोसळला. वादळामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नगर व अन्य भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. या पावसाचा फटका उभ्या पिकांना बसणार आहे. नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.