डिझेल दरवाढीमुळे शेती व्यवसाय धोक्यात

jalgaon-digital
2 Min Read

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

शेतकऱ्यांचा आधुनिक शेती (Agriculture) करण्याकडे कल वाढत असताना डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ (Diesel Price Hike) झाल्यामुळे यंत्राद्वारेही शेती करणे कठीण झाले आहे. त्यातच बैल जोडीच्या किमती लाखो रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेती कशी करायची, असा प्रश्न बळीराजाकडून (Farmers) केला जात आहे…

नाशिक (Nashik) तालुक्यातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. सध्या लोहशिंगवे, वंजारवाडी, लहवीतसह परिसरात भाताची शेती करण्याचे प्राथमिक काम जोरदारपणे सुरू आहेत. शेतीचे काम करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

तसेच मजुरीने अशी कामे करून घेणे परवडत नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे.

मात्र डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यंत्राद्वारेदेखील शेती करणे कठीण जात आहे. त्यामुळे शेतकरी आता पर्यायी पिकांची लागवड (Crop sowing) करीत आहेत. दरम्यान काही मोजके शेतकरी बैलजोडीद्वारे शेतीची कामे करून घेत आहेत.

काही वर्षांपासून सालगड्याच्या मजुरीत वाढ झाल्याने बळीराजाने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. शेतीतील संकटांमुळे अधिक उत्पन्न मिळत नसल्याने बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेतीच्या उत्पन्नासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते.

त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे. करोनाच्या सावटामध्ये शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहे. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे त्यांना यंत्रावर अवलंबून रहावे लागत असून अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

पूर्वी बैलाच्या माध्यमातून शेती केली जात होती, त्यात बदल होऊन वेळेची बचत होते. म्हणून ट्रॅक्टरद्वारे शेती कसली जाऊ लागली. मात्र यंञाद्वारे शेती करताना इंधनांचे दर, मजूरी, तसेच महागडी जंतूनाशक औषधे, खते आदींच्या किमती शेती व्यवसायला परवडण्यासारख्या नाहीत. तसेच पावसाचा अनियमितपणा, वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून शेती करणे कठीण होत चालले आहे.

संतोष जुंद्रे, शेतकरी, लोहशिंगवे

Share This Article