करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सहकार्य करावे

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हयाच्या ग्रामीण भागातील करोनाची वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील करोना प्रादुर्भाव संदर्भात परिस्थितीचा आढावा, नवीन रुग्ण शोध व उपचार, रुग्ण उपचार करावयाच्या उपाय योजना याबाबत आढावा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी घेतला.त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.

कोविड -१९ च्या पार्शवभुमीवर जिल्हयातील लॉकडाऊन काढल्यामुळे करोनो रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात जुलै २०२० अखेर करोना प्रादुर्भाव कमी प्रमाणात होता. परंतु , सद्यस्थितीत दिवसागणिक ग्रामीण भागातील साधारण ३०० ते ४०० नविन रुग्णांची भर पडत आहे.

यात प्रामुख्याने निफाड, मालेगाव,सिन्नर, येवला व नाशिक ग्रामीण या तालुक्यामध्ये करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढतांना दिसुन येत आहे.

ग्रामीण भागात दुर्धर आजार तथा इतर व्याधी असलेल्या रुग्णांची घरोघरी जाऊन शोध घेऊन अशा आजार असलेल्या व्यक्तींना करोना संसर्ग होऊ नये.यासाठी त्यांची तपासणी केली जात आहे. घरभेटीमध्ये संशयित रुग्ण आढळल्यास अशा रुग्णांना कोविड सेंटरमध्ये संदर्भित केले जात आहे.

सद्यस्थितीत ग्रामीण भागात करोनाचे आजपर्यंत १० हजार २४९ रुग्ण आढळले असुन यात ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हददीतील ६७१० रुग्ण असुन नगरपंचायत हददीतील ३५३९ रुग्ण आहेत. जिल्हयाती ग्रामीण भागातील आजपर्यंत ७६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन २२९५ रुग्ण विविध शासकिय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ग्रामीण भागातील मार्च २०२० पासुन आजपर्यंत एकुण उपचार घेणाऱ्या करोना रुग्णापैकी २९६ रुग्ण मृत्यु झालेले आहेत. दि. ६ सप्टेबर २०२० रोजी ३५२ नवीन रुग्णांची भर पडलेली आहे.

ग्रामीण भागातील संशयित रुग्णांना तात्काळ करोना टेस्ट होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, लासलगाव येथे अँटीजन टेस्ट चालू करण्यात आलेली असुन ग्रामीण रुग्णालय निफाड येथे सुद्धा अँटीजन टेस्ट सुरू करण्यात येणार आहे.

खबरदारी घ्यावी : डॉ. आहेर

ग्रामीण भागात नाशिक, इगतपुरी, मालेगाव , नांदगाव, निफाड व सिन्नर या तालुक्यामध्ये करोना संसर्ग मोठया प्रमाणात फैलावत असुन याबाबत शासकिय यंत्रणा करीत असलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी दक्ष राहुन आपल्यासह आपल्या कुटुंबाला करोनापासुन बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सुचना नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांनी दिल्या आहेत.

सद्यस्थितीत ग्रामीण भागातील निफाड, मालेगाव, नांदगाव व सिन्नर या तालुक्यामध्ये करोना प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असून प्रशासनाने केलेल्या आवाहनांना प्रतिसाद देऊन प्रत्येक व्यक्तीने सक्तीने मास्क वापरणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी करोनाबाबत जनजागृती करुन करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना आपल्या ग्रामस्तरावर राबविण्यात याव्यात. ग्रामीण भागात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवक ,आशा कार्यकर्ती व प्रशासकिय यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. करोनावर मात करण्यासाठी जनतेने आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. प्रशासन देत असलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *