मानव-बिबट्यांचा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागातर्फे समिती

मुंबई –

राज्यात मागील काही वर्षात मानव व बिबट्यांच्या संघर्षात मोठी वाढ झाली आहे तसेच बिबट्यांची मृत्यू संख्यासुद्धा

वाढत आहे.

याबाबत अभ्यास करण्यासाठी एक तांत्रिक अभ्यास समिती नेमावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत केली होती. त्या अनुषंगाने 11 सदस्यीय तांत्रिक अभ्यास समिती नेमण्यात आली असून ही अभ्यास समिती पुढील तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (पश्चिम) मुंबई श्री.सुनील लिमये यांचे अध्यक्षतेखाली ही 11 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती बिबट्यांच्या मृत्युच्या कारणांचा अभ्यास करणे, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, बिबट्यांमुळे मनुष्य हानीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीचा अभ्यास करणे व मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे याबाबत तांत्रिक अभ्यास करून आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *