राहाता l प्रतिनिधी
तालुक्यात सर्वदूर रिमझीम पावसाने हजेरी लावली तर दिवसभर सुर्यदर्शनही होवू शकले नाही. हवामान खात्याने पावसाचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला. रिमझीम पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
सध्या रब्बी हंगामासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे. अनेक शेतक-यांनी कांदा, हरबरा, गहू व ज्वारीची पेरणी केली आहे. ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. औषध फवारणीचा खर्च देखील वाढला आहे. अनेक शेतक-यांनी अद्याप पेरण्या केलेल्या नाहीत त्यांनाही पोषक वातावरणासाठी वाट बघावी लागणार आहे.
पेरू, द्राक्ष, बोर आदी फळपिकांना देखील या वातावरणाचा फटका बसत आहे. फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी शेतक-यांना कसरत करावी लागणार आहे. दरम्यान पावसामुळे गारवा वाढल्याने अनेकांना हुडहूडी भरली.