नाशिक । Nashik
सध्या जिल्ह्यात रात्रीची थंडी आणि दिवसा काही अंशी ढगाळ वातावरण अशा बदलत्या परिस्थितीचा सामना करत आहे.मात्र ,यामुळे द्राक्ष बागांवर भुरी करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.अशा परिस्थितीत द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागत आहे.
कडाक्याची थंडी तसेच ढगाळ वातावरण यामुळे कांदा पिकावर कीड व रोग तर द्राक्ष बागांवर भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत कांदा व द्राक्ष पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी अतिरिक्त औषधे खरेदी करावी लागत आहेत.
यामुळे द्राक्ष उत्पादकांना औषधांचा भार वाढल्याने आर्थिक फटका बसत आहे. कांदा, द्राक्ष अशा पिकांना आधीच बाजार भाव नसल्याने त्यातच उत्पादन घेण्यासाठी अधिकचा खर्च वाढल्याने हा खर्च वसूल होतो की नाही ? अशी चिंता द्राक्ष उत्पादक तसेच कांदा उत्पादकांना भेडसावत आहे.
सध्या ढगाळ हवामानामुळे कमी सूर्यप्रकाश मिळत असल्याने द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.ज्याठिकाणी यापूर्वी हलकासा पाऊस पडला आहे. त्या भागातील द्राक्षांवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे.दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून थंडीचे प्रमाणही वाढले आहे.
थंडीचे प्रमाण वाढून तापमानात कमालीची घट झालेली असल्यामुळे ज्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरले आहे.त्या द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात सापडणार आहे.