Wednesday, April 24, 2024
Homeनगरलेखी आश्वासनावर समाधान नाहीच

लेखी आश्वासनावर समाधान नाहीच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान बुधवारी सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी आरोग्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर डॉ. रामटेके यांनी लेखी आश्वासन दिले. परंतु, यावर डॉक्टर, परिचारिकांचे समाधान न झाल्याने आम्ही काम बंद आंदोलनावर ठाम असल्याचे महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंंबर रोजी आग लागली. यानंतर सरकारने चौकशी समिती नियुक्त केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना दोषी धरून त्यांना गुन्ह्यात वर्ग करून घेतले. यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आठव्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते.

जिल्हा रुग्णालयात तातडीने आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात यावी किंवा ही यंत्रणा जोपर्यंत बसविण्यात येत नाही तोपर्यंत आम्हा डॉक्टर, कर्मचार्‍यांना झालेल्या दुर्घटनेस जबाबदार धरण्यात येऊ नये, असे लेखी आश्वासन डॉक्टर, परिचारिकांना पाहिजे आहे. बुधवारी जिल्हा शल्यचिकित्स डॉ. रामटेके यांनी आरोग्य संघटनेच्या अध्यक्षा आंधळे यांच्यासह पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केली. चर्चेनंतर लेखी आश्वासन दिले. परंतु, या आश्वासनावर समाधान न झाल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटना पदाधिकार्‍यांनी घेतला आहे.

दरम्यान, राज्यातील इतर पाच ते सहा जिल्ह्यांमध्येही याप्रकरणी काम बंद आंदोलन सुरू असून अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्‍यांना पाठींबा दिला आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांत काळ्या फिती बांधून आंदोलन केले जात आहे.

आज आरोग्य मंत्र्यांची भेट

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनावर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे समाधान झाले नाही. यामुळे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असून आज, गुरूवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी वेळ दिला आहे. संघटनेचे तीन ते चार पदाधिकारी दुपारी मंत्री टोपे यांची भेट घेऊन म्हणणे मांडणार असल्याचे राज्य संघटनेच्या अध्यक्षा आंधळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या