मुंबई –
हवेत चांगलाच गारठा निर्माण झाल्याने देशासह राज्याला, मुंबईला थंडीची चाहूल लागली असून, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी
मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. 1 नोव्हेंबरला मुंबईचे किमान तापमान 21 अंश नोंदविण्यात आले असून, पवई आणि बोरीवलीसह उपनगरात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 20 अंशाखाली नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे ऑक्टोबर सरतानाच श्रीनगरचे किमान तापमान 0.1 ते 0.2 अंश नोदविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण सर्वसाधारणरित्या ऑक्टोबरच्या उत्तर्धात श्रीनगरचे किमान तापमान खाली उतरत नाही.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमधील पावसाचा विचार करता मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. त्या मानाने विदर्भात कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून आता बर्यापैकी संपला असून, मुंबईसह राज्याला थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईच्या किमान तापमानात आता घसरण नोंदविण्यात येत असली तरी अद्याप थंडीला येथे म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. मात्र येत्या काळात मुंबई राज्यात पारा बर्यापैकी खाली येईल, असा अंदाज लावला जात आहे.
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मालेगाव 18.8
बीड 18.5
माथेरान 20
डहाणू 21.6
सांगली 21.1
नाशिक 16.6
बारामती 18.5
सातारा 19.2
नांदेड 16.5
कोल्हापूर 21.5
उस्मानाबाद 18.4
परभणी 16.5
पुणे 17.1
सोलापूर 19.2
जालना 19.2
मुंबई 21