अर्थमंत्र्यांचा पेटारा आज उघडणार

jalgaon-digital
3 Min Read

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी लोकसभेत 2020-21चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून त्यांच्या पेटार्‍यातून शेतकरी, नोकरदार, उद्योजक, महिला तसेच अन्य घटकांना वाट्याला नक्की कोण-कोणत्या योजना आणि सवलती येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

येणार्‍या बजेट 2020 मध्ये सर्वसामान्य नोकरदारांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल होऊ शकतो. 1 फेब्रुवारी बजेट 2020 सादर करण्यात येणार आहे. आज (31 जानेवारी) लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक सर्व्हे 2020 मांडला. या बजेटमध्ये इन्कम टॅक्समधून कर्मचारी वर्गाला दिलासा मिळू शकतो.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज लोकसभेत आर्थिक सर्व्हे 2020-21 सादर केला. या सर्व्हेक्षणावरुन असा अंदाज वर्तवला जात आहे की, सरकार बजेट 2020 मध्ये टॅक्सपेयर्सच्या इन्कम टॅक्समध्ये मोठा दिलासा देऊ शकते. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी घोषणाही करण्याची शक्यता आहे.

मकॉर्पोरेट टॅक्समध्ये घट केल्यानंतर इन्कम टॅक्समध्येही घट करण्याची मागणी सतत सुरु होती. आर्थिक क्षेत्रात मागणी आणि उपभोग वाढण्यासाठी इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणे गरजेचे आहे. करदात्यांना सूट देऊन आर्थिक क्षेत्रातील मागणी वाढू शकतेफ, असं तज्ज्ञांनी सांगितले.
सध्या इन्कम टॅक्समध्ये तीन स्लॅब आहे. यामध्ये 2.5 ते 5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के स्लॅबमध्ये ठेवले आहेत. तर 5-10 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर 10 लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लावला जातो. येणार्‍या बजेटमध्ये 10 लाख उत्पन्नावर मोठी सूट मिळू शकते. या इन्कम वर्गासाठी 10 टक्क्यांचा नवा स्लॅब येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बजेटमध्ये 2.5 ते 5 लाख वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स लावला जात आहे. यामध्ये काही बदल केले जाणार नाहीत. 5 ते 10 लाख वार्षिक उत्पन्नावर सध्या 20 टक्के टॅक्स आहे. ज्यामध्ये घट करुन 10 टक्के केली जाणार आहे. यासाठी नव्या स्लॅबचा प्रस्ताव येऊ शकतो. म्हणजे तीन स्लॅबच्या जागी आता चार स्लॅब असणार आहेत. 2.50 लाख उत्पन्नावर टॅक्स फ्री असेल. सध्या 10 लाखांच्यावर उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लावला जातो. सूत्रांनुसार हा स्लॅबही मोडण्यात येणार आहे. तर 10 ते 15 लाख उत्पन्नावर 20 टक्के आणि 15 लाखांच्यावर उत्पन्न असलेल्यांवर 30 टक्के टॅक्स लावला जाऊ शकतो. तर दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यावर 35 टक्के टॅक्स आकारला जाऊ शकतो.

नगरकरांना काय मिळणार?
या अर्थसंकल्पातच रेल्वेबाबतच्या तरतुदी करण्यात येतात. त्यामुळे नगर जिल्ह्यातील नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी किती तरतुद केली जाते याबाबत उत्सुकता आहे. तसेच पुणे-संगमनेर-नाशिक हा रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. नगर-पुणे, पुणतांबा-रोटेगाव तसेच अन्य प्रस्तावित रेल्वेमार्ग आहेत. त्यासाठी तरतूदीची अपेक्षा आहे. तसेच जागतिक किर्तीचे देवस्थान शिर्डीसाठीही काही दिले जाते का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून निश्चितच मोठ्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी ते यंदा राज्यातील अनेक भागात आलेला पूर आणि यामुळे शेतीचे झालेले नुकसान अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. म्हणून शेतकर्‍यांच्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला नक्की किती निधी येणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकर्‍यांना मदत वाढवून दिली जाऊ शकते. सध्या 6 हजार रूपये मिळणारी मदत वाढवून 8 हजार केली जाऊ शकते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *