Friday, April 26, 2024
Homeनाशिकछत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव लोककल्याणोत्सव व्हावा : डॉ. शहा

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव लोककल्याणोत्सव व्हावा : डॉ. शहा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे अत्यंत विद्वत्त साहित्यिक व्यक्तित्व होते. रयतेचा राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, छत्रपती शिवरायांचे स्वराज्य वाढवण्यासाठी त्यांनी केलेले अजोड पराक्रम व त्यांची युद्धनीती आपण समजून घेतली पाहिजे….

- Advertisement -

अगदी कमी आयुष्यात हे लोककल्याणासाठी केलेला त्याग, बलिदान व स्वराज्याची वाढवलेली शक्ती बघता यापुढे शंभूराजांचा जन्मोत्सव लोककल्याणोत्सव म्हणून साजरा करा, असे आवाहन इतिहास अभ्यासक, लेखक डॉ. जी. बी. शहा (Dr. G. B. Shaha) यांनी रामशेजवर (Ramshej) झालेल्या कार्यक्रमात केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इतिहास अभ्यासक गिरीश टकले (Girish Takle) होते.

२१ वर्षे श्रमदानातून नाशिक जिल्ह्यातील दुर्गांचे तसेच अजिंक्य रामशेजच्या अखंडित दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या ११ वर्षे रामशेजच्या माथ्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) जन्मोत्सव उपक्रमात झाला.

पूर्वसंध्येलाच रात्रभर जागून फुलहारांनी रामशेजच्या गोमुखींमहाद्वार सजवण्यात आले. याठिकाणी छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे प्रतिमा व दुर्गसंवर्धन साहित्याचे, दुर्गपूजन पुष्प वाहून इतिहास अभ्यासक गिरीश टकले, डॉ.जी बी शहा, हातगड किल्ल्यांचे शिवकालीन किल्लेदार गंगाजी देशमुख यांचे १३ वे वंशज मनोहर मोरे देशमुख यांच्या हातून झाले.

यावेळी इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की रामशेजच्या अभेद्य लढ्यावेळी नाशिक (त्यावेळचे गुलशनाबाद) मुघलांचे ठाणे असतांना जवळच काही अंतरावर असलेल्या तुलनेने लहान रामशेजच्या संख्येने कमी मराठ्यांनी धैर्याने रामशेज अजिंक्य राखला. त्याकाळी शहाबुद्दीन खान, कासीम खान, बहादूर खानास मराठ्यांनी झुंजत ठेवले. अखेर बांधलेला दमदमा ही फसला. त्र्यंबकगड अखेर रामशेजच्या मदतीस धावला.

रामशेजवर चालून आलेल्या बादशहासारख्या जागतिक सत्तांना लहानशी शिबंदी ही धडा शिकवते हे रामशेजच्या लढ्यातून आपण समजून घेतले पाहिजे. १६८० ला शिवरायांच्या निधनानंतर तीन ते चार लाखांची फौज लवाजमा घेऊन बादशहा औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. तो त्याचा फाजीलपणा होता. त्याकाळी काहीजण बादशहाला मिळाले मात्र संभाजी महाराजांच्या कर्तुत्वापुढे बादशहा झुकला. स्वराज्यात त्यावेळी २५ वर्षे या औरंगजेबाने भारतीय उपखंडाचे सर्वात जास्त नुकसान केले, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अखेरीस शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने इतिहास अभ्यासक लेखक डॉ जी बी शहा, इतिहास अभ्यासक गिरीश टकले, मनोहर मोरे देशमुख यांचे हातून “वणवा विझवणारे वीर पुरस्कार” अनुक्रमे वृक्षवल्ली फाउंडेशन, दरीमाता वृक्षमित्र परिवार, मायना डोंगर विझवणारे दरी गाव मंडळ, पांजरपोळ पर्यावरणमित्र, “दुर्गसंवर्धन कार्य पुरस्कार” स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्था, दिंडोरी, देहेरगड संवर्धन टीम, हिंदवी स्वराज्य संवर्धन टीम, हातगड संवर्धन कार्यासाठी राबणारे शिवकालीन किल्लेदार वीर गोगाजी देशमुख यांचे १३ वे वंशज मनोहर मोरे देशमुख यांना तर जलसंवर्धनाचा पुरस्कार जलपरिषद (त्रंबक, सुरगाणा, पेठ) यांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिवकार्यचे राम खुर्दळ, तुषार पिंगळे, शिवाजी धोंडगे, प्रदीप पिंगळे, जितेंद्र साठे, रोहित गटकळ, भारत पिंगळे,भाऊसाहेब चव्हाणके,शुभम मेधने,किरनभाऊ दांडगे,सागर शेलार,बजरंग पवार,इंद्रजित पाटोळे,देविदास कामडी,आशिष प्रजापती,वेदांत पटेल,व संस्था मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक राम खुर्दळ यांनी केले सुत्रसंचालन तुषार पिंगळे यांनी तर आभार सागर शेलार यांनी मानले.

तब्बल ११ वर्षे अखंडित रामशेज संवर्धन तसेच दरवर्षी छत्रपती संभाजीराजेंचा जन्मोत्सव आम्ही नित्याने करतो. उद्देश हा की येणाऱ्या विद्वात्त मान्यवारांकडून दुर्गांचा इतिहास वास्तव कळावे, तसेच सन्मानित करणाऱ्या राबणाऱ्या संस्थांचा सन्मान व्हावा, त्यांची ऊर्जा वाढावी व सर्वांची भेट व्हावी हा यामागे उद्देश आहे.

– राम खुर्दळ (संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक)

- Advertisment -

ताज्या बातम्या