नाशिक । Nashik
करोना महामारीच्या दुसर्या लाटेच्या तीव्रतेच्या परिणामी शहरातील भिकार्यांची गर्दी असलेल्या बहूतांश सिग्नलवरून हे भिकारी गायब झाल्याचे चित्र रस्त्यांवर दिसत आहे.
नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाच्या दुसर्या टप्प्यात सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. दुसर्या लाटेची तीव्रता पाहता जिल्ह्यात 10 दिवसांचे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत 3 लाख 86 हजार बाधित रूग्ण झाले आहेत. तर आतापर्यंत पावणे पाच हजार जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.
एप्रिलमध्ये सुरू झालेल्या दुसर्या लाटेने अवघ्या दोन महिन्यात शहरासह ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात संक्रमण केले. परिणामी हजारो जणांचे बळी घेतले. अनेकांना साधे तसेच ऑक्सीजन बेड मिळत नसल्याचे सर्वत्र चित्र होते. ही साथ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 12 ते 22 मे दरम्यान लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू केले होते. परिणामी शहरातील बहूतांश वाहतुक थांबली होती.
सिग्नल यंत्रणाही बंद असल्याने या ठिकाणी वाहने थांबत नव्हती. तसेच करोनाच्या भितीमुळे भिकारी मुलांना कोणीही वाहन चालक जवळ फिरकु देत नव्हते. यामुळे तेथे असलेल्या भिकार्यांना पैसेच न मिळाल्याने व उपासमारीच्या भितीने त्यांनी सिग्नल, मंदिरे तसेच भिक मागण्याची शहरातील ठिकाणी सोडल्याचे चित्र होतेे.
०१ जुनपासून नाशिक जिल्हा ग्रीन झोनमध्ये आल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. यामुळे लोक बाजारपेठांवर तुटू पडले होते. तसेच सर्व सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. परंतु अद्यापही कोरोनाचा धोका असल्याने सिग्नलवर भिकारी येतील का किंवा आले तरी त्यांना कोणी भिक देतील का याबाबत शंका उपस्थित होत आहे.
शिवभोजन थाळीचा लाभ
अवघ्या १० रूपयांत मिळणारी शिवभोजन थाळी शासनाने पहिल्या लॉकडाऊनमध्ये 5 रूपये तर नंतर मोफत केली. यामुळे या मोफत शिवभोजन थाळीचे पार्सलचा लाभ भिकार्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला. तसेच त्यांची उपासमार टाळण्यात शिवभोजन थाळीचा मोठा वाटा आहे.
– उमेश चव्हाण, शिवभोजन थाळी चालक
अन्नछत्रांचा आसरा
लॉकडाऊन काळात सिग्नलवरील गर्दी कमी झाल्याने तसेच कोणी भिक देत नसल्याने उपासमारीच्या भितीने बहूतांश भिकार्यांनी पंचवटीत संत गाडगे महाराज धर्मशाळा तसेच इतर ठिकाणी सुरू असलेल्या अन्नछत्रांचा आधार घेत तेथे तसेच गंगेवर आसरा घेतल्याचे दिसून येत आहे.