अहमदनगर (प्रतिनिधी) –
अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत 27 व 28 जानेवारीला काढण्यात येणार आहे. या दोन दिवसांपैकी कोणत्या तालुक्यात कधी आरक्षण सोडत
काढायची याची जबाबदारी त्यात्या विभागाच्या प्रांताधिकर्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तर आपल्या गावचा नवा सरपंच, उपसरपंच कोण याबाबत उत्सुकता लागून आहे.
जिल्हातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी दिला आहे. सोडत कार्यक्रमाचे सर्व अधिकार प्रांताधिकार्यांना बहाल करण्यात आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले वगळता अन्य तालुक्यांतील 27 व 28 या दोन्ही दिवशीपैकी कोणत्या तालुक्यात कधी आरक्षण सोडत असेल याचा कार्यक्रम प्रांताधिकारी जाहीर करणार आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयात ही सोडत होईल. पाच वर्षांसाठी हे आरक्षण राहणार आहे. दरम्यान, पूर्णतः अनुसूचित क्षेत्राशी संबंधित आरक्षण 29 जानेवारीला अकोले तहसील कार्यालयात होणार आहे.यात अकोले तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी 705 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. यात 13 हजार 194 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सोमवारी निकाल जाहीर झाला, मात्र सरपंच कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण पॅनल तर काही गावात अर्धवट पॅनल निवडून आले आहेत. त्यामुळे त्या गावात आरक्षणानंतरच कोणत्या गटाचा सरपंच होणार आहे, ते समजणार आहे. त्यात निम्म्या ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे.
असे आहेत आरक्षित सरपंच पद
अनुसूचित जाती
एकूण -151
महिला-76
¶¶¶¶¶¶¶¶¶¶
अनुसूचित जमाती
एकूण-83
महिला-42
¶¶¶¶¶¶¶¶¶¶
ओबीसी
एकूण-329
महिला-165
¶¶¶¶¶¶¶¶¶¶
खुला
एकूण-655
महिला-328