मुंबई | Mumbai
अजित पवारांनी (AJit Pawar) केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फुट पडली असून आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी शिंदे- फडणवीसांच्या युती सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवारांसह ९ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह खासदार उपस्थित असल्याचे दिसले. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही समावेश होता. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. यानंतर कोल्हे यांनी आपल्याला शपथविधीची काही कल्पना नव्हती, वेगळे कार्यक्रम आहे म्हणून येथे बोलवण्यात आले. मात्र आपण नेहमी शरद पवारांसोबत आहोत अशा आशयाची सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिले होते. पंरतु, आता ते आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत कोल्हे यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “आधी मला शपथविधी आहे हे माहिती नव्हते. शपथविधी सुरू झाल्यावर मला राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे असा प्रश्न पडला. याचे उत्तरदायित्व, विश्वासार्हता, नैतिकता या सर्व गोष्टींना तिलांजली देणारे असेल तर मला राजकारणातच राहायचे नाही. त्यापेक्षा मग मी खासदारकीचाच राजीनामा देईन. या राजकारणासाठी मी आलेलोच नाही, अशी माझी सरळ स्वच्छ भावना होती.” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मी लवकरच शरद पवारांची भेट घेणार असून आपला राजीनामा देईल असेही कोल्हे म्हणाले आहेत.