Friday, April 26, 2024
Homeनगरज्यांची चौकशी सुरू, तेच मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत

ज्यांची चौकशी सुरू, तेच मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाविकास आघाडीतील विविध नेत्यांच्या नावाने मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीची चर्चा सुरू असली तरी यामागे काहीतरी छुपा गेम दिसतो, ज्यांच्या चौकश्या सुरू आहेत तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार दिसू लागले आहेत, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे लगावला.

- Advertisement -

शेवगाव येथे मागील महिन्यात झालेल्या दंगल प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसन चव्हाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकर नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचे अनेक जण स्वप्न बघत आहेत, पण त्यांचे सीट वाटपही अजून झालेले नाही.

खुद्द शरद पवार यांनीही महाविकास आघाडीची सीट वाटप चर्चा पुढे सरकत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आधी सीट वाटपावर एकाग्रता करावी, सीट वाटपाचा विषय भिजत ठेवायचा व दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांची चर्चा करायची, पण ज्यांच्या चौकश्या सुरू आहेत, तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार दिसत आहेत, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

अहमदनगर या नावामागे इतिहास आहे. मात्र, आता नव्याने दिलेले अहिल्यानगर नाव गैर नाही. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी जन्मस्थळ नगर जिल्ह्यात आहे व होळकर घराण्याचे राज्य त्यांनी पुढे चालवले आहे, परंतु त्याच्या प्रशासकीय व लष्करी कर्तव्याची चर्चा होत नाही तर त्या देवभोळ्या होत्या, असे चित्र निर्माण करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे, असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार की नाही याबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना, आम्ही ठाकरेंवर हा विषय सोडला आहे, असे भाष्य त्यांनी केले. राजकीय नेत्यांमधील बदलत्या भाषा शैलीवर बोलताना, ज्यांना कष्ट करून काही मिळाले नाही, त्यांच्याकडून अशी भाषा येते. कष्टकरी एकमेकांना सन्मान देतात, परंतु ज्यांना आयते मिळाले, त्यांची ही भाषा असते, असे ते म्हणाले.

मागील चार वर्षात महाराष्ट्रातून 35 हजार महिला व मुली गायब आहेत, परंतु त्याच्यावर राजकारण सुरू आहे. त्याबाबत लव्ह जिहाद असा प्रचार सुरू आहे, परंतु ही बाब मी खरी मानत नाही, असे स्पष्ट करून आंबेडकर म्हणाले, प्रेम प्रकरण हे नैसर्गिक आहे, हे मान्य केले पाहिजे. प्रेमाला लव जिहादचे नाव देऊन वातावरण खराब करणे योग्य नाही. प्रेमात या दोघांनी एकत्र जगण्याचे ठरवले असताना दुसर्‍यांना त्यावर बोट ठेवण्याचाअधिकार नाही. त्यामुळे असा प्रचार- प्रसार करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शेवगावची दंगल म्हणजे राजकीय शत्रुत्व

शेवगावमध्ये घडलेली दंगल म्हणजे विरोधकांचा राजकीय शत्रुत्व काढण्याचा प्रकार आहे. या दंगल प्रकरणी आपल्या राजकीय विरोधकांची नावे जाणीवपूर्वक या घटनेमध्ये गुंतविण्यात आली आहेत. अशा घटना विरोधकांकडून जाणीवपूर्वक घडविल्या जातात, असा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या