अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील आढळा मध्यम प्रकल्पामध्ये सद्यस्थितीस 1004 दलघफू (94%) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. दिनांक 6 सप्टेबर 2023 पर्यंत आढळा प्रकल्पाच्या उजवा व डावा कालवा मिळून 350 हेक्टर क्षेत्राची मागणी प्राप्त झाली होती, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकर्यांनी शेतीसाठी आवर्तनाची केलेली मागणी विचारात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थिती समजावून घेत टंचाई परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी खरीप आवर्तन सोडण्याचे आदेश अहमदनगर पाटबंधारे विभागास दिले आहेत. त्यानुसार आवर्तन सोडण्यात येणार असून, सदर आवर्तनामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील 13 गावांमधील पिकांना फ़ायदा होणार असून लाभक्षेत्रातील शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.