नाशिक | प्रतिनिधी
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात संचारबंदी व जमावबंदी करण्यात आली असतानाही अनेकजण आदेशाचे उल्लंघन करून वाहनांवरून भटकंती करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
१९ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आदेश उल्लंघन करणार्या ७३३ नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून ११९३ जणांना नोटिसा दिल्या आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी घराबाहेर जाणे टाळा, सामाजिक अंतर ठेवा, अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर जायचे असेल तर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे.
तरीही काहीजण दुचाकी व कारने मित्रांसह रस्त्यांवर येत हुल्लडबाजी करत असून मोबाईलमध्ये फोटो व शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत.
१९ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करणार्या १ हजार १९३ जणांना नोटिसा दिल्या आहेत. ७३३ जणांवर १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
अफवा पसरवणार्या २ जणांवर कारवाई केली असून २६८ जणांची वाहने ताब्यात घेतली आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घरा बाहेर पडू नये अन्याथा कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.