मुंबई | राज्यात आज कोरोनाबाधित ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबई येथील असून १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. आजच्या बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज राज्यात ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी प्रत्येकी १ रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील आणि २ जण मुंबई येथील आहेत.
राज्यात आज एकूण ५९५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११ हजार ९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सध्या राज्यात ३८ हजार ३९८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३०७२ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे.
आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील
मुंबई २७८
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ७०
सांगली २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा ५५
नागपूर १६
यवतमाळ ४
अहमदनगर २०
बुलढाणा ५
सातारा, औरंगाबाद प्रत्येकी ३
कोल्हापूर, रत्नागिरी प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद प्रत्येकी १
इतर राज्य – गुजरात १