मुंबई / Mumbai – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Politics of Maharashtra) उलथापालथ होवू शकते. भाजपा (BJP) आणि शिवसेना (Shivsena) एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पडद्यामागून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याने आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याची चर्चा आहे. सध्याच्या परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्तार कधीही होऊ शकतो.
दरम्यान, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सध्या दोन्ही पक्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, फडणवीसांना मोदी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्यानंतर भाजपा-शिवसेना एकत्र येत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील आणि भाजपाचे 2 उपमुख्यमंत्री बनवतील असं सांगण्यात आलं आहे.
परंतु केंद्रीय कॅबिनेट विस्ताराचा महाराष्ट्रातील राजकारणाशी काहीही संबंध नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा नाही. पक्ष नेतृत्वाबाबत तडजोडीला तयार नाही. कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या दुप्पट जागा जिंकल्या आहेत असं भाजपातील काही सूत्रांचे म्हणणं आहे. एनडीटीव्हीने याबाबत रिपोर्ट दिला आहे.
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही ही चर्चा फेटाळून लावली आहे. ते महाराष्ट्रातच राहतील. भाजपात कोणता निर्णय घ्यायचा ते पंतप्रधान ठरवतात. ते जे काही ठरवतील ते सगळ्यांनाच मान्य करावं लागतं. पक्षाने मला विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली आहे. ती मी निभावत आहे. मला दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. पक्ष याबाबत निर्णय घेईल असं फडणवीसांनी सांगितले आहे.
परंतु भाजपातील सूत्र सांगतात की, शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर शिवसेनेचा नंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना शिवसेना-भाजपाने एकत्र यावं असं वाटतं. शिवसेना-भाजपा यांची युती होऊ शकते. अनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष वेगळे झाले होते. 8 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात झालेल्या संवादानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘आम्ही भारत-पाकिस्तानसारखे नाही, आमचं नातं आमिर खान आणि किरण रावसारखं आहे. म्हणजे शिवसेना-भाजपाचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. परंतु मैत्री कायम आहे’ असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
तर शिवसेनेतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सध्या शिवसेनेचे प्राधान्य आगामी मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांवर आहे. पुढील वर्षी राज्यात 10 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जर शिवसेना-भाजपात युती झाली नाही तर दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर पुन्हा भाजपाच्या नेतृत्वावर भरवसा ठेवणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?
पंकजा मुंडेंच्या नावाचीही चर्चा
देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही केंद्रातील मंत्रीमंडळात स्थान दिले जाऊ शकते. महाराष्ट्रातील या दोन नेत्यांची वर्णी केंद्रात लागू शकते. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 29 जूनला दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांना केंद्रात बोलवण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर मागील काही दिवसांपासून ते केंद्रातील कामाचं देखील कौतूक करताना दिसत आहेत.