नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची शिफारस करणारा अहवाल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सादर झाल्याचे कळते. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी स्वत: अहवाल सोनियांकडे सोपविला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या अहवालासंदर्भात सोनिया गांधी, दिग्विजय सिंग आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी ए. के. अॅन्टनी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरच जाहीर करणार आहे.
राज्यात कॉंग्रेसची स्थिती अतिशय उत्तम असल्यामुळे पक्षाने सर्वच्या सर्व म्हणजेच 288 जागांवर उमेदवार उभे करावेत, अशी सूचना दिग्विजय सिंग यांनी आपल्या अहवालात केली आहे. स्वबळावर लढून पुन्हा सत्तेवर येणे शक्य असल्याचा विश्वास अहवालातून व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
अहवालातील शिफारशींवर अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकीय समिकरणे बिघडण्याची शक्यता राजकीय पंडित व्यक्त करत आहेत. मात्र यासंदर्भात निर्णय घेताना घाई होऊ नये, अशी सोनिया गांधी यांची इच्छा असल्याचे दिसते. त्यामुळेच अहवालाबाबत विचार सुरू आहे आणि लवकरच योग्य निर्णय जाहीर करणार असल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे. मात्र अहवालाचा तपशील अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
याआधीच दिग्विजय सिंग आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढावे, अशी भूमिका घेतली आहे तर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आघाडी करणार की नाही याबाबत अतिशय सावध पवित्रा घेतला आहे. |