- सर्वोच्च न्यायालयाने खासदार पद्मसिंह पाटील यांचा जामीन नाकारल्याने जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला असून, खा.पाटील यांना आता निश्चित तुरुंगात जावे लागेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
खा.पाटील यांनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याची फिर्याद हजारे यांनी दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाटील यांना तात्पुरता जामीन दिला होता. या जामीनावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन फेटाळला. यामुळे खा. पाटील यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हजारे राळेगणसिध्दी येथे पत्रकारांशी बोलत होते. न्यायमूर्ती सावंत आयोगामध्येच खा.पाटील यांच्याविरूद्ध तेरणा सहकारी साखर कारखाना, कारगिल घोटाळा, भूकंप घोटाळा अशा अनेक गुन्ह्यात आरोप सिध्द झाल्याने ते दोषी असल्याचे सिध्द झाले होते. आपल्या खुनाच्या सुपारी प्रकरणाबाबतच्या जामीन अर्जावर न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य असून, यामुळे सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे. |