इस्लाम धर्माने सर्वप्रथम जगातील महिलांना सन्मान व सुरक्षा तसेच वारसा हक्क व लग्न, घटस्फोटात समानता दिली हे कायदे आजच्या ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ द्वारे भारताच्या संविधानाप्रमाणेच राबविले जातात, असे प्रतिपादन एस.एस. मणियार लॉ कॉलेजच्या प्रा. डॉ. विजेतासिंग यांनी जिल्हा महिला असोसिएशन व खिद्मत-ए-खल्ब महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई हॉल येथे आयोजित मुस्लिम महिलांच्या कार्यशाळेत महिला दिनाच्या पूर्व संध्येला केले.
प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या रेहाना बैलिम, प्राचार्या शमीम इक्बाल, महिला असोसिएशनच्या अध्यक्ष उषा सरोदे, सचिव प्रभा शर्मा, सीमा उपाध्ये आदी उपस्थित होत्या. महिला मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. विजेतासिंग यांनी मुस्लिम महिलांचे हक्क व पर्सनल लॉ या विषयावर उपस्थित महिलांना माहिती करुन दिली तसेच पवित्र कुराण, हदीस यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्त्या रेहाना बैलीन यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुस्लिम महिलांच्या समस्यांवर प्रकाश टाकत स्वत:चा संघर्ष उलगडून दाखविला. यावेळी त्या म्हणाल्या की, वयाच्या २० व्या वर्षी घटस्फोट झाल्यानंतर शपथ घेतली की यापुढे कोणत्याही प्रश्नावर अधु न पडता धैर्याने संघटीत होऊन संघर्ष करावा आणि त्यानुसारच आपले जीवन घडविले. प्राचार्या शमील इकबाल यांनी मुस्लिम महिलांसाठी शिक्षणाची उपयुक्तता या विषयावर मार्गदर्शन केले. आयोजक सीमा उपाध्ये यांनी प्रास्ताविकात मेळाव्याच्या आयोजनांची भूमिका विषद केली. सूत्रसंचालन शिक्षिका कमरखान यांनी तर आभार प्रभा शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवती व महिला उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी महिला असोसिएशनच्या कार्यकर्त्यांसह जैन स्पोर्ट ऍकॅडमीच्या खेळांडूनी परिश्रम घेतले. |