- महापालिकेच्या बंद पडलेल्या शहर बससेवेची माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून मागविण्यात आली असून नाशिक आणि सोलापूरच्या धर्तीवर नगर शहरात बससेवा सुरू करण्याच्या हालचाली एस.टी.महामंडळाकडून केल्या जात आहेत. शहर बससेवा पूर्ववत होण्याची आशा यामुळे निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेली शहर बससेवा सुरू करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. विविध संघटनांनी बससेवा पूर्ववत करण्यासाठी आंंदोलने छेडली. खासगी वाहतुकीने वैतागलेल्या नागरिकांनी या माध्यमातून आवाज उठविला आहे. मात्र ही सेवा अत्यावश्यक नसल्याने ती पूर्ववत करण्याची जबाबदारी आपली नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले. महापालिकेने जबाबदारी झटकल्यानंतर ही सेवा सुरू करायची कोणी असा प्रश्न निर्माण झाला होता. सुदैवाने राज्य परिवहन मंत्री म्हणून आ. राधाकृष्ण विखे यांची निवड झाली. परिवहन मंत्रीच या जिल्हयातील असल्याने त्यांनी शहर बससेवेस प्राधान्य देत पहिल्याच भेटीत बससेवा एस.टी. महामंडळाकडून लवकरच चालू करण्यात येईल, असे आश्वासन देवून आशेचा किरण निर्माण केला.
शहर बससेवेचे आव्हान पेलने तसे एस.टी.महामंडळास कठीण आहे. पण हायकमांडची आज्ञा झाल्याने एस.टी.महामंडळाने ही सेवा सुरू करण्यास संमती दर्शविली. महापालिकेस शहर बससेवेविषयी काडीचेही सहकार्य न करणार्या महामंडळाने आज च्नक याबाबत माहिती घेतली. शहर बससेवेचा सद्यस्थितीचा अहवाल एस.टी.च्या प्रादेशिक कार्यालयाने मागविल्याने महापालिकेस शहर बससेवेविषयी आशा निर्माण झाली आहे.
खासगी ठेकेदारामार्फत ही सेवा पुरविली जात होती. मात्र ठेकेदारास ही सेवा देणे आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले. परिणामी ठेकेदाराने ही सेवाच बंद करून प्रशासनास वेठीस धरले. त्यांनी अतिर्नित पैशाची मागणी केली होती. महापालिकेने कराराच्या विरोधात जाण्यास मात्र नकार दर्शविल्याने सेवाच बंद झाली. यामुळे नव्या चकचकीत बसगाड्या एकाच जागेवर उभ्या राहिल्या. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बसगाडयांचीही दुरवस्था झाली. महापालिका आणि संबंधित ठेकेदार यांच्यात वादात गाड्यांची वाट लागली. बस खरेदीसाठी येथील महानगर बँकेकडून कर्ज घेण्यात आले आहे. त्याची परतफेड न झाल्याने या बँकेने त्यांचा जाहीर लिलाव केला. त्यात दोन बसची विक्री झाली. परंतु, उर्वरित बसगाड्या सावेडी क्रीडा संकुलात धूळखात पडून आहेत. त्यांचे काय करावे असा प्रश्न महापालिकेस समोर उभा आहे. ही सेवा नागरिकांना देण्यात महापालिका, एस.टी.महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन या तीनही कार्यालयांची भूमिका महत्त्वाची आहे. शहरातील रिक्षांच्या चोरट्या वाहतुकीस आळा घातल्यास ही सेवा तग धरू शकणार आहे. अन्यथा पहिले पाढे पंचावन्न होण्यास वेळ लागणार नाही.
रिक्षा बंद केल्यास त्यास रिक्षा संघटनांकडून जोरदार विरोध केला जाणार हे उघड आहे. त्यास महामंडळास तांेंड द्यावे लागणार आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांचा थेट संबंध लोक प्रतिनिधींशी असल्याने याविषयी तूर्तास तरी कोणीही बोलण्यास तयार नाही. वरिष्ठ पातळीवरून याविषयी होणार्या आदेशाचे पालन करण्यास या विभागांनी तयारी चालविली आहे. शहर बससेवेचे नियोजन या विभागाकडून सध्या केले जात आहे. राजकीय नेत्यांनी अनुकूलता दर्शविल्यास एस.टी. महामंडळ नागपूर, सोलापूर आणि नाशिक येथील शहर बससेवेच्या धर्तीवर ही सेवा नागरिकरांना देण्यात येईल. वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या आदेशानुसार काम करण्याची तयारी येथील एस.टी. महामंडळाने दाखविली आहे. बससेवा सुरू करण्याचा आदेश मिळताच शहरातील रस्ते, बेकायदेशीर वाहतूक आणि संघटनांशी चर्चा केली जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
|