शहारातील नागरिकांनी सामाजिक भावनेने प्रत्येकाने काम केले तर सण, उत्सव, सोहळा व मिरवणूकांच्या बदोबस्तांसाठी पोलीसांची आवश्यकता भासणार नाही, यासाठी सर्वानी एक दिलाने काम केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना केले.
जिल्हयात दि. ५ फेब्रुवारी रोजी मुस्लीम समाजाचा ईद-ए-मिलाद सणानिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक शांततेत साजरी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे, आ. जयकुमार रावल, अपर जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर, अपर पोलीस अधिक्षक मोहन पवार , निवासी उपजिल्हधिकारी विवेक गायकवाड , प्रातांधिकारी टी. डी. हुलवळे व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करतांना म्हणाले की ईद सण शांततेत साजरा होण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व दृष्टीने सज्ज असून मिरवणूकीच्या मार्गावर काही ठिकाणी सी.सी.टीव्ही बसविण्यात येणार आहेत. जनतेने सामाजिक सलोखा टिकवून सण साजरा करावेत .
जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले की, हे सर्व सण लोकोत्सव असून हे साजरी करतांना कधी कधी समन्वयाचा अभाव असतो, तो टाळायचा असेल तर समन्वय महत्वाचा असला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगीतले. आ. जयकुमार रावल म्हणाले की, सर्व सण शांततेने साजरे करण्यासाठी जबाबदार नागरिकांनी पुढाकार घ्यावा. जिल्हयात संयम व शांततेचे वातारण राहिल्यास विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगीतले. तर यावेळी शांतता समितीचे सदस्य शाबीर शेख, राजेंद्र पाटील ,संजय बगदे,डॉ. महेश घुघरी, एम.जी.ढिवरे, संजीवनी सिसोदे,आदि सदस्यांनी अनेक सुचना केल्या. प्रस्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले की, ईद-ए-मिलाद साजरा करण्यासाठी ज्या ज्या विभागांकडे कामाची विभागणी केली आहे त्यांनी योग्य प्रकारे काम करावे. उप विभागीय पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राऊत यांनी आभार मानले.
|