- जर्मनीमध्ये पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. भारतात मात्र पाण्याची कमतरता असल्याने पाणी हे एखाद्याच्या आयुष्यात किती कठीण प्रसंग निर्माण करू शकते, हे जर्मनीत राहून समजू शकले नसते. यापुढील काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष डॉ. हॉर्स्ट कोहलर यांनी केले.
राष्ट्राध्यक्ष डॉ. कोहलर आज भारत भेटीवर आले असता त्यांनी संगमनेर तालु्नयातील दरेवाडी या गावास भेट दिली. तसेच, तेथील पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाची पाहणीदेखील केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी इव्हा ल्युईस कोहलर, जर्मनीच्या अर्थमंत्री गुडरन कॉफ, नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी डॉ.पी.अन्बलगन, पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांच्यासह जर्मनीचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष डॉ. कोहलर यांचे सकाळी 11 वाजता दरेवाडी येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत वॉटर संस्थेने केलेल्या कामांची पाहणी केली. येथील गायकवाड वस्तीवर त्यांनी गावकर्यांशी संवाद साधला. तसेच, दरेवाडी येथे प्राथमिक
शाळेच्या आवारात घेण्यात आलेल्या ग्रामसभेतदेखील त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना कोहलर म्हणाले, की येथील लोकांनी ज्या पद्धतीने सन्मान केला, आदरातिथ्य केले, त्यामुळे भारावून गेलो. कार्यक्रमस्थळी काढण्यात आलेली रांगोळी आवडल्याचे नमूद करीत या भेटीने दोन राष्ट्रांतील मैत्री वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. पाणी हे जीवन आहे. हे तत्त्वज्ञान फादर बाकर यांनी सांगितले. लोकसहभागातून विकासाला चालना मिळू शकते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कामाची पाहणी केल्यानंतर समाधानी झालेल्या राष्ट्राध्यक्षांनी बाकर यांना पत्र लिहून भावना कळविणार असल्याचे सांगितले. अर्थमंत्री गुडरन कॉफ म्हणाल्या, की हेलिकॉप्टरमधून येताना हा भाग हिरवागार दिसला. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमातून हे यश साध्य झाले. त्यामुळे आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे बदल घडण्यास मदत झाली. या पाणलोट विकास कार्यक्रमामुळे यापुढील काळात येथील लोकांना चांगले भवितव्य असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. |