इंदिरानगर, दि. 6 (वार्ताहर)- वडाळा गाव येथील लाकडी खोकी तयार करणार्या कारखान्यास भीषण आग लागून त्यात कारखाना पूर्णत: खाक झाला. अग्निशामक दलाच्या 60 जवानांनी सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्यासाठी पाण्याचे तीस बंब वापरण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वडाळा गावातील महेबूबनगर येथे मन्नान हुसेन खान, ताजद्दीन खान, मोहम्मद सैय्यद यांच्या मालकीच्या लाकडी खोकी तयार करण्याच्या कारखान्याला सकाळी 11.30 च्या सुमारास अचानक आग लागली. आगीत कारखाना जळून खाक झाला. मन्नान हुसेन यांच्याही कारखान्यास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दलाचे नाशिकरोड, सातपूर, शिंगाडा तलाव, पंचवटी, नवीन नाशिक या पाचही केंद्रांतून 15 बंप घटनास्थळी अवघ्या 15-20 मिनिटात हजर झाले. कारखान्यात सफरचंदाच्या पेट्या बाहेरगावाहून आणून त्यापासून टोमॅटो व द्राक्ष पेट्या तयार केल्या जातात. गेल्या 10 वर्षापासून व्यवसाय सुरू आहे. अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर पी.व्ही. तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली आग 4.30 वाजता पूर्णपणे विझविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. 15 बंबांनी दोनदा खेपा मारल्या. कारखाना पत्र्याचा असल्याने चारही बाजूंनी बंदिस्त असल्याने पत्रे काढण्यासाठी दोन जेसीबी मागवण्यात आले.
अग्निशामक दलाचे सब ऑफिसर व्ही.के. गवळी, फायर आफिसर आर.एम. बैरागी, बी.एफ. सासरे, बी.बी. गायकवाड, एस.बी. निकम, ए.व्ही. जाधव यांच्यासह 60 कर्मचार्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
अग्निशामक दलाचे महेश बागूल यांच्यासह मदत करणारे नागरिक अस्लम शाह, जाकीर शाह, नासिर खान, रफिक शेख यांना हाताला किरकोळ जखमा झाल्या. परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलाला मदद केली.
|