मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) - पाकिस्तानने 26/11 सारखे हल्ले कधी आणि कोठेही करावेत. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले सुरूच रहावेत आणि तरीही पाकिस्तानी खेळाडूंनी या देशात खेळण्याची परवानगी द्यावी. शिवसेना कोणालाही अडवणार नाही, असे उद्विग्न उद्गार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढले आहेत. मराठी माणसाच्या वाटेला जावून जर कोणी महाराष्ट्र मुंबईपासून तोडण्याचे कारस्थान केले तर त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही शनिवारी पुन्हा त्यांनी दिला. कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुंबईत केलेल्या दौर्यामुळे शिवसेनेचे निषेध आंदोलन पुरते ‘फ्लॉप‘ ठरले. त्यामुळे उद्विग्न होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना‘ या मुखपत्रातून आपला संताप व्यक्त केला आहे. कॉंग्रेसच्या कृपेमुळे देशात कोणीही खुशालपणे हैदोस घालावा शिवसेना त्याला विरोध करणार नाही, असे सांगत शिवसैनिकांनी स्वत:ची टाळकी फोडून, सालटी सोलून घ्यायची, कारण नसताना तुरूंगवास भोगायचा हे सर्व कोणासाठी आणि का करावे? असा सवाल त्यांनी मराठीजनांना विचारला आहे. राहुलच्या दौर्यात कॉंग्रेसचे मंत्री रमेश बागवे ‘युवराजांचे‘ जोडे उचलून निष्ठेचे ओंघळवाणे प्रदर्शन करतात. तरीही कोणाला घातली हे कोणीच समजून घेत नाही. शाहरूख खान पाकिस्तानवर प्रेम करा सांगतो. तरीही येथे कोणाचा श्र्वास का घुसमटत नाही, असे उद्विग्न प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी उपस्थित केले आहेत. |