|
| शाहरुख-शिवसेनेची मांडवली |
|
| Mumbai(07-February-2010) |
Tags : News,Regional,National,Maharashtra |
मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) - माफी मागितल्याशिवाय शाहरुखचा माय नेम खान या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ दिले जाणार नाही, अशी डरकाळी फोडणार्या शिवसेनेने काल साफ माघार घेतली. विदेशातून काय बोलतोस मुंबईत येऊन बोल अशी आव्हानात्मक गर्जना नेते राऊत यांनी केली होती ती फुसकी ठरली. ऐनवेळी शाहरुख आणि शिवसेना यांनी मांडवली केली. त्यामुळे एक संघर्ष टाळला गेला. शाहरुखचे मुंबईमध्ये आज आगमन झाले. तेव्हा त्याला कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आली. मात्र शिवसैनिक कुणीही त्याच्याविरोधात कोणताही विरोध करण्यास कुठेही उपस्थित नसल्याने शाहरुख सुखात घरी पोहोचला.
आपल्या विधानांचा विपर्यास केला होता, शिवसेनेला आता आपली भूमिका पटली असल्यामुळेच त्यांचा विरोध सौम्य झाल्याचे मत प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याने शनिवारी व्यक्त केले. बाळासाहेबांकडून बोलावणे आल्यास आपण त्यांना भेटायला जाणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
शिवसेनेने ‘माय नेम इज खान‘ या चित्रपटाला विरोध करण्याची भूमिका घेतली होती. पण शनिवारी शाहरूख खान मुंबईत परतल्यावर सेनेकडून त्याच्या विरोधाबाबतची सेनेची भूमिका मवाळ दिसली. शाहरूख खानने शनिवारी सायंकाळी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपली भूमिका त्यांना पटली असावी म्हणूनच त्यांचा विरोध सौम्य झाल्याचे सांगितले. आपण मुंबईकर तसेच भारतीय आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. याच मुंबईने माझे करिअर घडविले आहे. त्यामुळे मुंबईकरांबद्दल आपल्याला आदर आहे. माझ्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावला गेला होता. आता सेनेला त्यांची चूक उमगली असावी असे सांगत त्याने आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सूचित केले.
शिवसेनाप्रमुखांबाबत आपणाला आदर असून त्यांनी भेटायला बोलावल्यास आपण जाणार आहोत याआधीही आपण त्यांना भेटलो होतो तो यावेळी म्हणाला.
|
प्रिंट काढा |
|
|
|