उपवर मुलींच्या लग्नासाठी 50 हजाराच्या आतील ठेवीदारांना पूर्ण व 50 हजाराच्या वर रक्कम असलेल्या ठेवीदारांना 50 टक्के रक्कम धनादेशाद्वारे परत करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले. मात्र धनादेश हातात मिळाल्यानंतरच उपोषण स्थगित केले जाईल, अशी माहिती मनसे ठेवीदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी डोलारे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.
उपवर मुलींच्या लग्नासाठी ठेवींच्या पूर्ण रकमा परत कराव्या या मागणीसाठी तापी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी दि.22 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण पूकारले आहे. उपोषणाच्या दुसर्या दिवशी सहकार खात्याकडून ठेवीदारांची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आज तब्बल सात दिवसानंतर अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ व जिल्हा उपनिबंधक सुनिल बनसोडे यांनी तापी पतसंस्थेचे मनिष पारीख यांना बोलावून मागणीविषयी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यात 50 हजाराच्या आतील ठेवीदारांना पूर्ण रक्कम व 50 हजाराच्या वर ठेव असलेल्यांना 50 टक्के रक्कम धनादेशाद्वारे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र धनादेश प्रत्यक्षात हातात मिळाल्यानंतर उपोषण स्थगित केले जाईल, अशी माहिती अश्विनी डोलारे यांनी दिली. |