नाशिक, दि. 9(जि.प. प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सन-2010-11 चा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यात 522 गावांमध्ये व 415 वाड्यांमध्ये मिळून एकूण 937 गाववाड्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार असून तेथे विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यासाठी 4 कोटी 76 लाखांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी 9 मार्चपर्यंत जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता; मात्र अद्याप जिल्ह्यात टँकर सुरू झालेला नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले. 97 गावांमध्ये 125 विंधन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पावणे पाच कोटी रुपयांच्या टंचाई कृती आराखड्यात टंचाई जाणवण्याची शक्यता असलेल्या साडेनऊशे गाववाड्यांमध्ये विविध प्रकारच्या नऊ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात नळ पाणीपुरवठा योजना,विंधन विहीर विशेष दुरुस्ती योजना, तात्पुरत्या पुरक नळपाणीपुरवठा योजना, विहीर खोल करणे, बुडकी घेणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे व आवश्यक त्या ठिकाणी टँकरने व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे या योजनांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा टंचाई कृती आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र काही त्रुटींमुळे तो जिल्हा परिषदेला परत करण्यात आला होता. आता सुधारीत टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. मागील वषीर्र् 9 मार्चंपर्यंत जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र यावर्षी अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. आगामी एप्रिलमध्ये जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे आहेत. |