जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
मनपातील बेजबाबदार अधिकारी, कर्मचार्यामुळे विकासकामे रखडतात, अधिकार्यांकडून मुद्दाम अनेक प्रस्ताव उशीराने चर्चेस येतात, अनुकंपा भरतीबाबत धोरणास उशीर, अधिकार्यांची उदासीनता, नळसंयोजनाबाबत धोरणाचा अभाव, 22 लाखाच्या मोटारी बसविण्याच्या खर्चाअभावी नागरिकांना अल्प पाणीपुरवठा, दीडदीड वर्ष लाईट बसवले जात नाहीत असे एक ना अनेक मुद्यांवर स्थायीत जोरदारपणे चर्चा झाली.
अशा दिरंगाई करणार्या अधिकारी, मक्तेदार, कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी, असा सूर सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांनी मांडून अशा दिरंगाई करणार्यांवर जोरदार ताशेरे ओढण्यात आले. त्यामुळे मनपाची स्थायी समितीची सभा गाजली.
बुधवारी स्थायी समितीची ऑफलाईन सभा 30 रोजी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त किरण देशमुख, उपायुक्त प्रशांत पाटील, नगरसचिव सुनील गोराणे, लेखाधिकारी कपील पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आरोग्य उपायुक्त पवन पाटील, आकाश डोईफोेडे आदीही यावेळी उपस्थित होते.
हे विषय मंजूर
सभेत एकूण 13 प्रस्तावासह आयुक्तांच्या संविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यात 15 व्या वित्तआयोग निधीप्राप्त अनुदान व विनियोगाबाबतची कार्यपध्दती निश्चितीबाबत पारित शासन निर्णयाची माहिती घेणे, दिलीप मंधाण यांची पाणीपट्टी निर्लेखित करणे, प्रभाग समिती 3 अंतर्गत रोशन पटेल तसेच विमल भामरे व इतर दोघांची गुंठेवारी करआकारणी निर्लेखित करणे, बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना मानधनावर नवीन आदेश होणेबाबत प्रस्ताव, मनपा इमारतीत व इतर मनपा मालकीच्या मिळकती ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणेकामी 70 लाखाच्या खर्चास मान्यता देणे व सिक्युरीटींना मुदतवाढ देणे, शहरात मुख्य जलवाहिनीसह इतर पाईप लाईनची वार्षिक व्यवस्था व दुरूस्तीकामी खर्चाची तरतूद, विविध विभागांना लागणारी ऑफसेट छपाईचे वार्षिक दर निश्चित करणे, प्रभाग 15 मध्ये भिंत बांधणे, प्रभाग 9 मध्ये खड्डे खडीने बुजणेकामी 50 लाखाच्या खर्चास मान्यता देणे हे सर्व विषय मंजूर करण्यात आले.
तर आयुक्तांकडील संविदाची सदस्यांनी केवळ माहिती जाणून घेतली. या संविदा मंजुरीस सदस्य जबाबदार राहणार नाहीत असा स्पष्ट मुद्दा कुलभूषण पाटील यांनी यावेळी मांडला. संविदामध्ये कोविड सेंटरमध्ये 50 कामगार पुरवणेकामी रस्ते व गटार सफाईकरीता कामगार पुरवणे, पाणीपुरवठा अंतर्गत व्हॉल दुरुस्ती, स्पेअर पार्टला मंजुरी देणे, विठ्ठलवाडीत खुल्या जागेस चेनलिंक करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे आदी संविदांचा समावेश होता.
खोटी हजेरी दाखवून लूट
आरोग्य व स्वच्छतेसाठी मनपात नेमून दिलेले कर्मचारी कामावर नसतात, त्यामुळे प्रभागातील स्वच्छता केली जात नाही, तसेच 10 कर्मचारी कामावर हजर नसतांना 40 माणसांची हजेरी मनपाचे एस. आय. हे लावतात असा प्रकार अनेक प्रभागात होत असून याद्वारे मनपाचे हित पाहण्याऐवजी लूट करीत असल्याचा प्रकार मनपाच्याच अधिकारी, मुकादम यांचेकडून होत असल्याचेही त्यांनी सभागृहासमोर मांडले.