पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
राज्य सरकारने नुकताच जनतेतून सरपंच निवडीचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे. मात्र फक्त सरपंचाचीच नव्हे तर थेट मुख्यमंत्र्यांची निवड सुद्धा जनतेतून व्हावी असा सरकारने निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
राज्य सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत हजारे बोलत होते. सरपंच परिषदेच्यावतीने हजारे यांचे यावेळी आभार मानण्यात आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने पुन्हा सदस्यातून सरपंच निवडीचा निर्णय घेतला त्यावेळी त्या निर्णयास राज्य सरपंच परिषदेने विरोध केला होता. त्यावेळी सरपंच परिषदेने हजारे यांची भेट घेऊन या मागणीस पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती.
त्यावेळी हजारे यांनी पत्राद्वारे ही बाब कळविली होती. आताच्या सरकारने पुन्हा सरपंच निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे त्यांनी स्वागत केले. सरपंच निवड जरी थेट जनतेतून होणार असेल तरीसुद्धा सरपंचांनी सुद्धा कोणतेही निर्णय घेताना ग्रामसभेला विश्वासात घेऊन घेतले पाहिजेत तरच खर्या अर्थाने थेट जनतेतून सरपंच निवडीच्या सरकारच्या निर्णयाला खर्या अर्थाने लोकशाहीचा निर्णय आहे, असे हजारे म्हणाले.