- जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या पेरण्या जोमाने होत असून, कापसाने तर रेकॉर्डच मोडले आहे. शेवगाव, पाथर्डीसह कर्जत व जामखेड या चारच तालुक्यांत कापसाची विक्रमी लागवड झाली असून, सरासरी 20 हजार 600 हेक्टर कापसाचे क्षेत्र असताना आतापर्यंत एक लाख सात हजार 378 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. ती तब्बल साडेपाचपट अधिक आहे.
जून महिन्यातच पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असून, आतापर्यंत जिल्ह्यात खरिपाच्या 103 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आणखी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. सर्वाधिक राहाता तालुक्यात 217.33 टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाच्या पेरण्या वाढल्याने कृषी विभागाने तातडीने खताची वाढीव मागणी केली. त्या खालोखाल पाथर्डी व जामखेड तालुक्यांत 154 टक्के पेरण्या झाल्या आहेत. शेवगाव, पाथर्डी, कर्जत व जामखेड या तालुक्यांमध्ये नेहमी सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडतो. मात्र, यंदा पावसाने या तालुक्यावर चांगलीच मेहेरनजर केल्याचे दिसते. सरासरीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाल्याने कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याचा फटका ज्वारी व बाजरीला बसला असून, या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सरासरी चार लाख 43 हजार 400 हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. यंदा पाच लाख तीन हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी चार लाख 58 हजार 158 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. कापूस, मूग, उडीद या पिकांच्या क्षेत्रातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कापसाची विक्रमी लागवड पहिल्यांदाच झाल्याने कृषी विभागही अवाक् झाला आहे.
या पेरणीने आजवरचे सर्वच रेकॉर्ड मोडले असून, शासनस्तरावरही यांची दखल घेण्यात आली आहे. पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र व टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. बाजरी दोन लाख 27 हजार 900 हेक्टरपैकी एक लाख 89 हजार 32 हेक्टर क्षेत्रावर अर्थात 70 टक्के पेरणी झाली आहे. मुगाचे क्षेत्र 13 हजार 800 वरून 18 हजार 256 क्षेत्र झाले असून, उडदाचे पाच हजार 500 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असताना, त्यात वाढ होऊन 13 हजार 864 म्हणजे 252 टक्के पेरणी झाली आहे. तूर-172 टक्के, सोयाबीन-152 टक्के, ऊस-6.8 टक्के. |