- तालुक्यातील शेडगाव येथील पारधी समाजाच्या आदिवासी महिलेवर श्रीगोंदा शहरातील भंगार व्यापारी नाना सोनवणे या नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत व पेडगावरोडवरील शेतात ओढत नेऊन जबरी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मात्र, या अत्याचारित महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास श्रीगोंदा पोलिस टाळाटाळ करीत आहेत.
शेडगाव येथील पारधी समाजाची आदिवासी महिला नवर्याशी भांडण झाल्याने श्रीगोंदा येथे राहत असलेल्या आई-वडिलांकडे जात होती. शहरातील सरस्वती नदीच्या पुलावरून पायी चालत कुकडी वसाहतीतून जात असताना नाना सोनवणे भंगारवाला मोटारसायकलवरून पाठीमागे येऊन ‘कुठे चालली आहे? मी तुला गाडीवर नेऊन सोडतो’, असे म्हणून गाडीवर बसवून पेडगाव रस्त्याने निर्जन शेतामध्ये घेऊन गेला. ‘आपण गणपतीचे दर्शन घेऊन जाऊ तू काळजी करू नकोस. दर्शन झाल्यानंतर मी तुला तुझ्या आई-वडिलांकडे नेऊन सोडतो,’ असे म्हणून लगट करू लागला. महिलेने विरोध केला असता, त्याने शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. ‘या बाबत कुणाला काही सांगितल्यास अगर पोलिसांत गेल्यास मी तुला व घरच्यांना जीवे मारीन, नाना भंगारवाला म्हणतात, असे म्हणून मला पेडगाव रस्त्यावरील निर्जन शेतामध्ये सोडून निघून गेला,’ असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. ही महिला झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मागण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आज (ता.28) सकाळी 11 वाजेच्यादरम्यान नातेवाईकांना घेऊन आली असता, पोलिसांनी तिची तक्रार दाखल केली नाहीच व तिने आणलेला तक्रार अर्जही स्वीकारला नाही. उलटपक्षी भंगारवाला नाना याच्या भावाबरोबर व काही वकिलांना मध्यस्ती करून पोलिस तडजोड करत होते, तर या अत्याचारित महिलेसह नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून तिची टिंगलटवाळी करत होते. श्रीगोंदा शहरातील भंगार व्यापारी नाना सोनवणे तालुक्यातील प्रतिष्ठित नेत्यांचे वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड शहरात लावून प्रतिष्ठित असल्याचे भासवतो. या नराधम नानाचे पोलिस स्टेशनला भंगाराच्या व्यवसायामुळे साहेबांकडे नेहमीच उठणे-बसणे असल्याने व काही प्रतिष्ठितांच्या संपर्कात असल्याने आपणावर पोलिसांत गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रतिष्ठितांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे बोलले जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश प्रसाद यांनी लक्ष घालून या आदिवासी अत्याचारित महिलेस न्याय मिळवूनद्यावा, अशी मागणी उपस्थित आदिवासी पारधी समाजाच्या काही बांधवांनी व्यक्त केली. |