मुंबई-नांदेड-लातूर एक्स्प्रेस गाडी मुंबई-लातूरच करावी, ती नांदेडमार्गे जाऊ नये, अशी भूमिका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या गाडीचा मार्ग नांदेडमार्गे लातूर असाच असावा, असा आग्रह रेल्वे प्रशासनाकडे धरल्याने या आजी-माजी मुख्यमंत्र्यांतील एक्स्प्रेस कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.
मुंबईहून नांदेडमार्गे लातूर अशी एक्स्प्रेसगाडी नव्याने सुरू करण्यात आली आहे. खास लातूरसाठी सुरू केलेल्या या गाडीचा लातूरकरांना फारसा फायदा होत नाही, अशी ओरड लातूरकरांत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याची दखल घेत विलासराव देशमुख यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी पत्रव्यवहार केला. ही गाडी खास लातूरकरांसाठी असताना नांदेडमार्गे का जाऊ दिली, नांदेडमार्गे असलेली ही गाडी लातूर-मुंबई अशीच असू द्यावी, नांदेडमुळे लातूरच्या लोकांना प्रवासासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, अशा मागण्या या पत्रात आहेत. याविरोधात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दंड थोपटले असून, ही गाडी नांदेडमार्गे लातूर अशीच जाऊ द्यावी, असा आग्रह धरला आहे. या वादात लातूरचे खासदार जयवंतराव आवळे यांनी उडी घेतली असून, ही गाडी लातूरकरांसाठी सोडली नाही तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. लातूरभेटीसाठी आलेल्या विलासरावांनीदेखील आमचा हक्क आम्हाला कायद्याने घेता येतो आणि हिरावूनही घेता येतो, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. लातूरचे विभागीय आयुक्तालय नांदेडला होणार अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. याशिवाय, लातूरला होणारे कृषी उपविभागीय कार्यालय, वीज वितरण कार्यालय यांची घोषणादेखील अशोकरावांनी केल्याने विलासरावांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई-नांदेड-लातूर एक्स्प्रेस निमित्त या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
|