-‘‘बेदी हे सर्वसाधारण गोलंदाज होते.ते नेहमी वादविवादात अडकलेले असत तसेच ते आज गोलंदाजीसाठी मैदानावर उतरले असते तर त्यांची खूप धुलाई झाली असती,’’ असे चोख उत्तर 800 बळींचा विश्वविक्रम नोंदवून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती झालेला श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनने त्याच्यावर नेहमीच टीका करणारे भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदींना दिले. त्यांना क्रिकेटमधील बारकावे कळतच नाही, असेही मुरली म्हणाला.
बेदींनी सुरुवातीपासून मुरलीला लक्ष्य करीत त्याच्यावर टीकास्त्र उपसले होते. ते नेहमी मुरलीला ‘चक्कर’ म्हणूनही हिणवत. मुरलीच्या ‘दुसरा’ या विशिष्टपूर्ण शैली असलेल्या चेंडूवर त्यांनी आयसीसीला प्रतिबंध लादण्यासही बर्याचदा प्रवृत्त केले. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात आठशे बळींचा टप्पा गाठून मुरलीने निवृत्ती घेतली. यानंतर मुरलीनेही बेदींच्याच शैलीत त्यांना परखडपणे उत्तर दिले. ‘बेदी हे खूपच सर्वसाधारण गोलंदाज आहेत, ते आजच्या परिस्थितीत गोलंदाजीला उतरले असते तर त्यांची गोलंदाजी फलंदाजांनी चांगलीच धोपटली असती. ते बी.एस. चंद्रशेखर, श्रीनिवासन, व्यंकटराघवन आणि ईरापल्ली प्रसन्नासारखे उत्कृष्ठ गोलंदाजी कधीच करू शकले नाहीत,’ असा टोलाही मुरलीने लगावला. बेदी हे स्पर्धेतून बाहेर पडलेले गोलंदाज होते. मी त्यांची गोलंदाजी पाहिली (चित्रफितीत) आहे. त्यात कुठलाही जोर नव्हता.दुसरा चेंडूबद्दल बोलताना मुरलीने बेदींवर चांगलेच तोंडसुख घेतले.त्यांना त्यांच्या गोलंदाजीत असे बदल करता आले नाहीत म्हणून ते नेहमी दुसर्यांच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतात.त्यांना फिरकीपटू म्हणणे योग्य आहे मात्र त्यांना चेंडूपेक्षा धावपट्टीचाच जास्त फायदा होत होता म्हणून ते चालत असत. भारताचा अनिल कुंबळे हा एकमेव सर्वश्रेष्ठ गोलंदाज होऊन गेला. त्याच्या गोलंदाजीत विविधता होती, तसेच मुरलीने मास्टर ब्लास्टरचेही कौतुक केले. |