नाशिक, दि.28 (प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचे काम 1 जुलैपासून सुरू करण्यात आले आहे, तर 16 जुलै पासून घरोघरी जाऊन मतदारांची नोंद होणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती, मात्र शहर, जिल्ह्यातील अनेक भागात अद्याप कर्मचारी पोहोचले नाही तर मतदान केंद्रांवरही कर्मचारी दिसत नसल्याने ही विशेष मोहीम फक्त घोषणेपुरतीच मर्यादित आहे का? असा परखड सवाल राजकीय पक्षांनी विचारला आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांमध्येही ही मोहीम कितपत यशस्वी होणार याबाबत शंका निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश नन्नावरे यांनी ही मोहीम म्हणजे फक्त दिखावा असून याबाबत आपण स्वत: कितीतरी वेळा मतदार याद्या दुरुस्तीसाठी निवडणूक शाखेत व निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या ठिकाणांवर जाऊन नाव नोंदणी व दुरुस्तीचा प्रयत्न केला असता कर्मचारी जागेवर नव्हेतच. शिवाय याबाबत निवडणूक शाखेशी संपर्क साधला असता आमचे कर्मचारी येतील, एवढेच माफक उत्तर मिळाले.
1 जानेवारी 2010 रोजी 18 वर्षे पूर्ण करणार्यांची नावे मतदार यादीत टाकण्यात येत असून दुबार नाव, लिंग, वय, पत्ता यामध्ये चुका असल्याने सदर पुनरिक्षण कार्यक्रमात दुरुस्ती करण्यात येणार आहे. 1 जुलै ते 31 ऑगस्टदरम्यान मतदान अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांच्या नाव नोंदीमधील दुरुस्ती व स्कॅनिंगचे काम करणार आहेत. 2 ते 24 ऑगस्टदरम्यान पुरवणी मतदार याद्या तयार करण्यात येऊन 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत छपाईचे काम होणार आहे. 15 सप्टेंबर 2010 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.घरोघरी होणार्या तपासणी मोहिमेत तीन वेळा अधिकारी येऊनसुद्धा मतदार न मिळाल्यास त्यांचे नाव यादातून कमी करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते, मात्र जिल्ह्यातील काही भागात अद्यापही कर्मचारी न पोहोचल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. (न्यायडोंगरी येथे अधिकार्याची अरेरावी आतील पानात)
|