पारनेर, दि. 10 - गावोगावाच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाला, की हमखास आठवण होते ती ‘तमाशा’ या महाराष्ट्राच्या लोककलेची. परंतु, अलीकडील प्रसारमाध्यमांच्या बदलत्या काळात रसिकांनी फिरवलेली पाठ, कमी झालेला राजाश्रय याचा मोठा परिणाम या कलेवर झाला असून, ‘तमाशा’ केवळ यात्रेपुरताच उरतो की काय? अशी श्नयता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील जुन्यातला जुना व विरंगुळ्याचा आधार म्हणजे तमाशा. राज्याच्या विविध भागात सादर होणार्या लोकनाट्याला बरीच नावे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तमाशा कलावंतांच्या समूहाला फड म्हणतात. हल्ली यात्रे-जत्रेच्या वेळी ऐसपैस जागेवर उघड्या पटांगणामध्ये तमाशा सादर करण्यात येतो. तमाशा शब्दाचा शब्दशः अर्थ पाहता उघडा देखावा असा आहे. जुन्या काळात तमाशाला लोकाश्रय तर होताच, पण राजाश्रयही होता. तमाशातील लोकांना या नाचगाण्याबद्दल धान्याच्या स्वरूपात मानधन मिळत असे. नंतर तमाशात ‘नाच्या’ मुलाऐवजी मुली आल्या. त्यांचे खेळ व्यवस्थितपणे तमाशागृहात होत. साधारणपणे 1950 नंतर फडकरी स्वतंत्रपणे गावोगावी जाऊन तमाशाचे खेळ करू लागले. त्याला खर्चही बराच येऊ लागला. तमाशात कधी कधी भडक श्रृंगाराचे वर्णन पाहायला मिळत असले तरी भक्तीरसदेखील तित्नयाच प्रभावीपणे मांडण्यात येतो, हे नंतरच्या काळातील वगनाट्यांनी सिद्ध करून दाखविले. तमाशा लोकनाट्याच्या स्वरूपात रंगमंचावर अवतीर्ण झाला. सध्या महाराष्ट्रात वेगवेगळे पाचशेच्यावर तमाशाफड आहेत. परंतु, हे केवळ यात्रेपुरतेच. इतर वेळी पावसाळा वगळता तिकिटावर, बाजाराच्या गावी खेळ करणार्या तमाशांची संख्या घटली. ही संख्या अवघी 15-16 एवढीच आहे. सध्या यात्रेचा हंगाम सुरू झाल्याने राज्यातील नारायणगाव, फलटण, कराड, सातारा, वीटा या ठिकाणी तमाशाफडांनी खेळाची सुपारी मिळवण्यासाठी तंबू थाटले आहेत. बदलत्या काळात तमाशातील सादरीकरणाची साधनेही बदलल्याने खर्चिक झालेल्या तमाशाची सुपारीही वाढली आहे. साधारण 25 हजार रुपयांपासून 70 हजार रुपयांपर्यंत ही सुपारी गेली आहे. प्रसारमाध्यमांच्या युगात घरबसल्या लावणीसारखे तमाशाप्रधान कार्यक्रम, चित्रपट पाहता येतात. यामुळे मराठमोळ्या रसिकांनी तमाशा कलेकडे पाठ फिरवली आहे. उच्चभ्रू वर्ग तमाशापेक्षा संगीतबारीच पसंत करीत असल्याने ही कला आता अडचणीत सापडली आहे. यात्रेजत्रेलादेखील अनेक ठिकाणी तमाशापेक्षा लावणीप्रधान कार्यक्रम सादर होऊ लागले आहेत. |