- महिलेचा विनयभंग करणार्या तथाकथित साधूंना फाशी देण्यात यावी, अशी मागणी पतंजली योगपीठाचे संस्थापक आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी केली आहे.
बंगळूरूमध्ये अलिकडेच एका धार्मिक नेत्याची कृष्णकृत्ये उघड झाल्याबद्दल, त्यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारच्या तोतया साधूंवर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख पथकाची स्थापना केली पाहिजे, अशी सूचना करून ते म्हणाले, असे लोक भगवे वस्त्र घालून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करत असतात. हिंदू धार्मिक नेत्यांची शिस्तभंग पंचायत किंवा आखाडा अस्तित्वात आहे. या पंचायतीमार्फत गुन्हेगाराला शिक्षा देण्यात येते. मात्र गुन्हेगारी वृत्तीचे अनेक लोक, अटक टाळण्यासाठी भगव्या वस्त्रांचा आडोसा घेताना दिसत आहेत. राज्यसभेत मंगळवारी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पुरुषांपेक्षा महिला कमी भ्रष्टाचारी असतात. राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाल्यास देशाचे भवितव्य बदलण्याची शक्यता आहे. महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या कल्याणासाठी सर्व क्षेत्रात सक्रिय आहेत, असेही रामदेवबाबा यांनी सांगितले.
|