- आयआयएम प्रवेशासाठी नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील सावळागोंधळ सुरूच आहे. तब्बल दोन आठवडे उलटले तरी अनेक उमेदवारांच्या मूळ परीक्षेचा निकाल मिळालेला नाही, तर पुनर्परीक्षेबाबत उलटसुलट माहिती दिली जात असल्याने प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सीईटीची परीक्षा घेणार्या प्रोमेट्रीक कंपनीने 28 डिसेंबरला सीईटीचा निकाल जाहीर केला. निकाल पाहिल्यावर विलेपार्ले येथे राहणारा चिंतन गाला याच्या लक्षात आले की, त्याचा निकाल आलेला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 30 जानेवारीला ही परीक्षा असताना, 23 जानेवारीला त्याला प्रोमेट्रीक कंपनीकडून ई-मेल आला, ज्यात लिहिले होते की, ही परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची असून, आधीच्या परीक्षेचे गुण गृहीत धरले जातील. त्यामुळे गालाने पुनर्परीक्षेला न बसण्याचा विचार केला. आता ही परीक्षा देणे बंधनकारक असल्याचा नवा ई मेल प्रोमेट्रिकने पाठविल्याने चिंतनच्या डोळ्यापुढे काजवे चमकले आहेत.
जवळपास 10 हजार उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्यास सांगण्यात आले होते. त्यापैकी 4 हजार 800 जणांनी पुन्हा परीक्षा दिली. गालाप्रमाणेच ज्यांचा निकाल आधी जाहीर झालेला नाही, असे अनेक विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसले नसल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत टीआयएमइ इन्स्टिट्यूटमध्ये सीईटीचे क्लास घेणारे आर्क्स श्रीनिवास यांनी व्यक्त केले. |