- राज्यातील दारिद्रयरेषेखालील जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनामार्फत दोन लाख रुपयांची वैद्यकीय विमा योजना लागू करण्याचा मानस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील शैक्षणिक संकुलात उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारक व तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर, जयकुमार गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब देसाई हे दूरदृष्टीचे, कर्तव्यनिष्ठ नेते होते, अशा शब्दात गौरव करून श्री.चव्हाण म्हणाले, की लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी संपूर्ण हयातभर सर्वसामान्य माणूस आणि गोरगरिबांच्या हितासाठीच काम केले. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम पाटण तालुक्यात प्रभावीपणे होत असून, राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच लोकनेत्याचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत आहे, ही आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. त्यांचे कार्य आणि विचारांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी दौलतनगर येथे उभारल्या जाणार्या कलादालनास राज्य शासनामार्फत लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली.
राज्यातील सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासाच्या आणि कल्याणकारी योजना राबविण्यात शासनाने पुढाकार घेतला असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, की राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यादृष्टीने राज्यात वैद्यकीय विमा योजना राबविण्याचा मानस आहे. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे वीज निर्मितीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सहवीज निर्मितीचा प्रकल्प हाती घ्यावा, त्यामुळे उसाला अधिक भाव देता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी शासन आवश्यक ती सर्व मदत करेल. |