मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी)- मांजरपाडा क्रमांक 2 वळण योजनेच्या सर्वेक्षणाचे काम कोणत्याही परिस्थितीत तातडीने झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज संबंधित अधिकार्यांना दिले. नाशिक जिल्ह्यातील लघुनाटबंधारे प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जलसंपदामंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री भुजबळ म्हणाले की, विकासकामे पूर्ण होण्याचा लाभ हा स्थानिकांनाच अधिक होत असतो. असे असतानाही केवळ एखाद दुसर्या व्यक्तीच्या विरोधामुळे प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षणच न करणे अत्यंत चुकीचे आहे. मांजरपाडा -2 हा टप्पा विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून त्याचे सर्वेक्षण तातडीने झालेच पाहिजे. त्याबरोबरच नाशिक विभागासाठी जाहीर केलेल्या विविध पाटबंधारे योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व प्रक्रिया संबंधित अधिकार्यांनी तातडीने पूर्ण करावी, अशी सूचनाही भुजबळ यांनी केली.
या बैठकीमध्ये नांदगाव, देवळा, सटाणा, मालेगाव, येवला या तालुक्यातील विविध लघुपाटबंधारे योजनांचा आढावा घेण्यात आला. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी (साबरदरा), साठवण तलाव (कुसुंबी नाला) या योजनांना पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळण्याबाबत स्थानिक स्तरावरून तातडीने प्रस्ताव पाठविण्याची सूचना भुजबळ यांनी केली. त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील कळवाडीतील विविध साठवण तलावांना तापी खोर्यातून पाणी उपलब्ध करण्यासाठीं प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी अजित पवार यांनी सगळ्या तालुक्यांना पाणी व्यवस्थित मिळेल, यादृष्टीने जे काही करता येईल ते करा, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या. रोजगार हमी योजनेंतर्गत अपूर्ण कामांची चौकशी पूर्ण करून ती सुद्धा मार्गी लावा, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला आमदार ए.टी. पवार, आ. दादा भुसे, आ. पंकज भुजबळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मालेगाव पाणीपुरवठा योजनेबाबत स्वतंत्र बैठक घेणार
मालेगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत सर्वमन्य तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्या समवेत स्वतंत्र बैठक आयोजित करून चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
|